शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

कथा डायरीची (२)

पार्श्वभुमी...

                    या कथेमागचा खरा आनंद अनुभवण्यासाठी या कथेतल्या दोन्ही पात्रांची पार्श्वभुमी जाणुन घेणे गरजेचे आहे..म्हणुन हा पार्श्वभुमी लिहण्याचा अट्टाहास...पार्श्वभुमी लिहितेय म्हटल्यावर कथेतली पात्रं म्हणाली, "आम्हीच सांगतो की, आमची पार्श्वभुमी.." लगेच बायको उताविळपणे म्हणाली, "मी आधी सांगणार..पहिल्या रात्री तुला सांगितलं तसं...". नवरा शांतपणे म्हणाला,''बरं, तसं पण लेडीज फर्स्ट...". तीने लगेच सुरवात केली...

                 "मी आत्ताची सौ. रुचिरा गौरव जोशी, आणि आधीची कुमारी रुचिरा वैभव देशमुख...माझं नाव बदललं नाही गौरवनं...त्याला माझं नाव खुप आवडतं..तर मी मुंबईत जन्मले, वाढले. वाळकेश्वर सारख्या निसर्गरम्य परीसरात राहत होतो आम्ही..त्यामुळे लहानपणीचे संवगडी तसे उच्चभ्रु घरातलेच..आमचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय आणि त्रिकोणी..म्हणजे मी, आई आणि पप्पा...एकटीच मुलगी असल्यामुळे पप्पांनी खूप लाड केले..हवं ते मिळत गेलं लहानपणापासुन..त्यामुळे स्वभाव थोडाफार हट्टीच...पप्पा तर मला आपला मुलगाच समजायचे..त्यामुळे मी बोल्ड होते ब-यापैकी पण तितकीच बालीशही...घरातल्या कामांचा प्रचंड कंटाळा..वास्तविक आई-पप्पानी कधी सवयच लावली नाही कामाची...मित्र-मैत्रिणी पुष्कळ..खरं तर मित्रच पुष्कळ..मित्र खूप भेटले, पण सखा कुणी भेटला नाही..ज्याची सोबत आयुष्यभर असावी असं वाटेल, ज्याच्यावर जिवापाड प्रेम करावं असं वाटेल..वय वाढेल तसा समंजसपणा वाढत गेला..कॉलेजमध्ये गेल्यावर जगच वेगळं वाटायला लागलं..आणि इथेच माझा प्रेमाचा शोध संपला..पहिल्यांदा प्रेमात पडले..फक्त एवढंच सांगते कि गौरवची ओळख व्हायच्या आधी मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते..म्हणतात पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही..पण तो सोडून गेला, मला एकटीला..आयुष्याच्या अश्या वळणावर..जिथुन एकटीला पुढे जाण्याची भीती वाटायला लागली..तिथेच रेगांळले खूप वेळ..त्याच वळणावर त्याला खूपदा शोधलं पुन्हा पुन्हा.. पुढे काय झालं ते माझी डायरी वाचुन तुम्हांला समजलेच..."
                असं म्हणुन ती आमच्या दोघांच्या तोंडाकडे पाहायला लागली..म्हणाली, ''सगळंच सांगितलं तर माझी डायरी कोण वाचेल..?''
                गौरव तिच्याकडे कौतुकाने पाहायला लागला..खरंच प्रेमात पडणा-या माणसाला सगळयाच गोष्टीचं कौतुक वाटतं..उदया ती साधं शिकंली जरी असती तरी त्याला तिचं कौतुक वाटलं असतं..असो..

                   मी गौरवला म्हटलं, ''आता तु सुरवात कर..''


                  '' मी गौरव पांडुरंग जोशी..आमचंही कुटुंब तसं छोटंसंच..मी, आई, बाबा, आणि माझी मोठी बहीण सुमित्रा..बेळगावमधल्या छोट्याश्या गावात माझा जन्म झाला...दहावी पर्यंतचं शिक्षण तिथलंच.रम्य या शब्दाला पुरुन उरेल असं माझं बालपण..मस्त विहिरीत पोहायचो..मी पोहायलो शिकलो तो मोठा किस्साच आहे..वाचायला मिळेल तुम्हांला, डायरीतल्या कुठल्यातरी पानावर..माझं गाव आणि माझं बालपण...पण, त्यामुळे मुंबईत आल्यावर बावचळलो..डिप्लोमा आणि डिगरी मामांच्या घरी राहुन पूर्ण केलं..खूप मित्र झाले..मुलींना फक्त पाहयाचो पण त्याच्यांबरोबर बोलण्याचं धाडस करू शकलो नाही..मैत्री तर खुप दूरची गोष्ट होती माझ्यासाठी...रूचाला पाहिलं आणि सगळं विसरलो..फक्त ती आणि फक्त तीच..'' मी गौरवला मधेच थांबवत म्हटलं,''अरे तुझ्याबद्दल सांग रे.." गौरव आपल्या गोंधळ्या नावाला सार्थकी लावत थोडासा गोंधळला...थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, ''हो हो..मी काय सांगू माझ्याबद्दल? मी रूचा सारखं आणखी कुणाच्या प्रेमात पडलो नाही.. तेवढा वेळच मिळाला नाही..सुमीचं लग्न झालं आणि मी एकटा पडलो..खूप पैसा कमावायाचा आणि मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं...मग लग्न करायचं असं सगळ्यांचं असतं तसं साधंसं स्वप्न होतं माझं..रूचा माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्याची ध्येयं, धोरणं बदलून गेली..आता मी फक्त तीला सुखात ठेवण्यासाठी जगतोय...'' मी मनात म्हटलं, याची गाडी पुन्हा एकदा रूचा नावाच्या ट्रॅकवर यायच्या आधी थांबावायला हवी..मी त्याला म्हटलं, '' पुरे आता गौरव, आपण पुन्हा एकदा आपल्या डायरीकडे वळूया..." तो म्हणाला, '' ठिक आहे.."


नवरा:

१३.०३.२००४

                 आज दिवसभर कशातच लक्ष लागत नव्हतं..वाटलं मामांनी तरी फोन करून विचारायला हवं होतं..मामांचा भलताच हट्ट म्हणे कि आपली मुलाकडची बाजू..त्यांना फोन करू दे..माझा इथे जिव जातोय..कुणाला माझी काळजी नाही..सारखी ती माझ्या डोळ्यासमोर येत होती..तीचं ते गोड हसणं..तीला कदाचित हे माहितही नसेल कि तिच्या रेखीव पातळ ओठांवरचा तीळ मला किती बेभान करत होता..तीचे डोळे मला सतत शोधत होते..का मीच तीला शोधत होतो..वेडा झालो आहे मी तिच्यासाठी, तिच्या एका भेटीसाठी...एक फोटो तरी घ्यायला हवा होता तिचा..ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल..म्हणत असेल काय बावळट मुलगा आहे हा.. नुसता पाहतोय माझ्याकडे..पण तिला जाणिव असावी स्वतःच्या सौंदर्याची...म्हणतात सुंदर मुलींना खूप गर्व असतो स्वतःच्या सौंदर्याचा..पण ही तशी नसावी..आणि असला जरी गर्व तरी त्यात काय गैर आहे...ती आहेच तेव्हढी सुंदर..मामा म्हणत होते, बघ विचार कर मुलीची उंची थोडी कमी वाटते...जाणवलं मला ते..पण तिचा चेहरा पाहिला आणि आणखी काही मला दिसलंच नाही...मगाशी गच्चीत उभा होतो तेव्हा चांदण्यांतून चालत चालत ती माझ्याकडे आली..मी स्तब्ध उभा होतो..हाताची घडी घालून..जणू तीचीच वाट पाहत होतो..ती आली आणि कठडयाला टेकून माझ्या शेजारी उभी राहली..त्या चांदण्यासारखीच मौन.. ह्या गडद पिठूळ चांदण्यानं जादू केली होती... हाताला लागेल का गं हे चांदणं? मी वेडयासारखा हात फिरवून पाहिला..चांदण्याचा स्पर्श होत नाही...ते फक्त जाणवतं..खरं सांगु तर तूही मला जाणवतेस सारखी पण तूझा स्पर्श माझ्या नशिबात आहे कि नाही माहीत नाही...तिला उदया फोन करायचं ठरवलं आहे मनात..
                                                                                
                                                                                                                                                     क्रमशः

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

व्यथा माझ्या मनातल्या..?


कधी कळतील का रे तुला..

व्यथा माझ्या मनातल्या..?

का वागतोस नेहमी..

माणसांसारखा जगातल्या..

माझे अंतरंग तूच फक्त जाणतोस..

का मग कळत नाहीत भावना मनातल्या..

म्हणतोस खूप प्रेम आहे..

अर्थ तरी कळतो का प्रेमातला..

कधी कळतील का रे तुला..

व्यथा माझ्या मनातल्या..?

रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

खेळ नशीबाचा...



अंगणात माझ्या...

सडा पारिजातकाचा..

कधीतरी रंग बदलतो..

आयुष्यातल्या सर्व फुलांचा..

कोण म्हणतं फुलं बोलत नाहीत..

त्यांनाही कधी कधी येत असेल कंटाळा,,,

आपल्याच आयुष्याचा...

मग कोणासमोर मांडतील..

हिशोब आपल्याच वेदनांचा..

कुणाचं प्राक्तन कुणाला चुकलं...

खेळ सगळा आपल्याच नशीबाचा..

कुणी देवाच्या पायावर, तर कुणी तिरडीवर..

तर कुणी चुरगळलेल्या चादरीवर..

खेळ सगळा आपल्याच नशीबाचा..

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

कथा डायरीची (१)

बायको:
१२.०३.२००४

                 आजची सकाळ मस्त होती...ब-याच दिवसांनी आज प्रसन्न वाटतं होतं..पप्पांची नुसती घाई चालली होती सकाळपासुन...त्यांचे कोणी मित्र येणार होते घरी त्यांना भेटायला..पप्पांचं हे नेहमीचंच...कुणी येणार म्हटलं कि,  सगळं घर स्वच्छ करत सुटतात....मी मात्र आपल्याच धुंदीत होते...सकाळी उशिरा उठले..निवांत ब्रश केला..सकाळचे सगळे विधी आटपल्यानंतर नेहमीसारखी खिडकीत जाऊन उभी राहिले...आज आभाळ अगदी स्वच्छ होतं..मनातले सगळे गोधंळ दूर झाल्यानंतर मन स्वच्छ होतं तसं..तोपर्यंत आईने हाक मारली..."जरा कांदा चिरून देतेस का गं?"...आईचा प्रश्न म्हणजे आदेशच असतो मुळी.. वैतागत मी म्हटलं,'' कशाला?''
               ''अगं, पोहे करायला हवेत..केवढी कामं पडली आहेत बघते आहेस ना तु..मला मेलीला एकटीला करावं लागतं सगळं.." आईचं पुराण कांदा चिरून दिल्याशिवाय संपणार नव्हतं......मी नाईलाजास्तव कांदा चिरायला बसले..आईची बडबड अखंड चालू होती..
             .''नव-याच्या घरी गेल्यावर अशीच वागणार आहेस का? शेण घालतील सासरची मंडळी आमच्या तोडांत...." तिची निरर्थक बडबड ऐकणं भाग आहे... माझ्या आयुष्याचा..(अशा वेळी माझे कान कसे बंद करायचे ते बरोबर कळतं मला)...तोपर्यंत पप्पांचे मित्र आले...त्यांच्या सोबत एक उंच मुलगा..जरा जास्तच उंच..डोळ्यांना चष्मा..चेह-यावर भरपूर पिंपल्स (तारूण्यपिटिका)..कपडे ठिकठाक...बिल्कुल आत्मविश्वास नाही...एकुण काय जरा विचित्रच ध्यान होतं....मी आतुन त्याचं निरीक्षण करत होते...बरंचसं निरीक्षण झाल्यावर मी माझं काम करायला लागले..
               तेवढयात पप्पांनी आवाज दिला..''रुचा, जरा बाहेर येतेस का?" असं सगळ्यांसमोर माझं नाव घेतलेलं मला आवडत नाही..असो..मी बाहेर येत नाही असं बघुन पप्पा म्हणाले, '' अगं बाहेर येतेस का जरा..तुझी ओळख करुन देतो''....पप्पा पण कधी कधी अतीच करतात...सगळ्यांना काय ओळख करुन दयायची...मी वैतागत बाहेर आले..पप्पांनी ओळख करुन दिली..''हे माझे मित्र..अनिकेत पुरानिक..आम्ही एकत्र शाळेत होतो.."
               मला पाहुन मात्र या काकांचा चेहरा पडला..मी उसनं हासू चेह-यावर आणलं... ते ही औपचारीकपणे हसले.. मग पप्पांनी त्याची ओळख करुन दिली..मी त्याचं नाव ऐकण्यासाठी उत्सुक होते..''हा गौरव जोशी..इंजिनिअर आहे..चांगल्या ठिकाणी जॉब आहे..तुलाही जॉबसाठी मदत करेल''
    ...असंच काहितरी सर्वत्र गवतासारखं पसरलेलं 'जोशी' आडनाव असावं याचं...हा माझा अंदाज खरा ठरला...मी त्याच्याकडे पाहत नव्हते...तो वेडा मात्र आल्यापासुन सतत माझ्याकडे पाहत होता..आपण कुठेही पाहत असलो तरी आपल्याकडे कुणीतरी पाहतंय, हे तरुण मुलींना बरोबर समजतं..असल्या नजरांची सवयच असते आम्हाला!...ते काका आपल्या भाच्याच्या कानात काहितरी कुजबुजले...
             थोडया वेळाने त्या वेडयाने मला विचारलं, "तुमची उंची किती आहे?" ...बावळटच आहे जरा हा...स्वतः उंच आहे म्हणुन सगळ्यांना त्यांची उंची विचारुन चिडवतोय कि काय हा..? मी विचारलं का, कि तु कोणती क्रिम लावुन ह्या एवढया तारुण्यपिटिका उगवल्यास त्या?......त्याची थोडीशी मस्करी करायची म्ह्णुन मी हळुच म्हटलं, ''एकशे त्रेपन्न सेंटिमिटर..''    बस म्हणावं आता हिशोब करत......तो थोडासा गोंधळला..पण लगेच त्याच्या चेह-यावरचे भाव पुर्ववत झाले...मग आईने सगळ्यांना पोहे दिले..पोहे मस्त झाले होते...तो गोंधळ्या अजुनही माझ्याचकडे पाहत होता..
                 त्याच्या मामांनी ''आम्ही निघतो'' म्हटलं आणि त्याच्याकडे पाहिलं, तर हा ढिम्म..जागचा हलेना...सगळं विसरल्यासारखा एकाच जागी बसुन होता..मंदच आहे वाटतं..मामानी पुन्हा एकदा आवाज दिल्यावर तो उठला..
               मी आणि पप्पा त्यांना सोडायला खाली बसस्टॉप पर्यत गेलो...परत घरी येताना पप्पांनी विचारलं, ''कसा वाटला मुलगा?'' मी मनात म्हटलं, '' सॅम्पल आहे.." मी गप्प आहे हे बघुन पुन्हा एकदा त्यांनी मला विचारलं, ''कसा वाटला गं मुलगा?''... मी म्हटलं,'' ठिक आहे, जरा जास्तच उंच आहे.." थोडा वेळ शांत राहिल्यानंतर पप्पा म्हणाले, ''तुला बघायला आले होते..ते लोक"...
               अरे कमालच आहे या लोकांची...मी काय प्राणीसंग्रहालयातला प्राणी आहे, मला बघायला यायला..
              मी म्ह्टलं, '' मला बघायला..कशाला?"
             पप्पा म्हणाले, ''अगं लग्न नको करायला तुझं..आयुष्यभर अशीच राहणार आहेस का?"
             मी म्ह्टलं, ''सांड दिसतो तो मुलगा..मला काहि पसंत नाही..मला मुळी लग्नच करायचं नाही..''
               एवढया लवकर लग्न वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही मी...मला लगेच ती पान परागची जाहिरात आठवली..मुलगी म्हणते..''शादी और तुमसे..कभी नहीं..." तसं मलाही म्हणावसं वाटलं '' लग्न आणि त्या सॅम्पल बरोबर ..कधीच नाही.."
                                                                                                                             (क्रमशः)

कथा डायरीची...!

प्रस्तावना...

आजपासुन एक गोष्ट सुरु करत आहे...रोज थोडं थोडं लिहेन..
ही कथा आहे एका जोडीची..
डायरीच्या जोडीची...एक डायरी नव-याची आणि दुसरी डायरी बायकोची...
तर सुरवात करुया नव-यापासुन...
नवरा :

१२.०३.२००४
                   आज मी तिला पाहायला गेलो होतो..रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम...तिचे वडील आणि माझे मामा क्लासमेट होते....मला एवढयात तरी लग्न करायचं नव्हतं..पण जावं लागलं..मग आम्ही तिच्या घरी निघालो...तिच्या घराजवळच्या मिठाईवाल्या जवळून मामा मिठाई घेत होते...आणि माझी नजर समोरच्या इमारतीकडे गेली..
              ...खिडकित ती उभी होती..तो चेहरा..खरंच पाहतच राहिलो...एक गोडंस चेहरा, चेह-यावर विलक्षण आत्मविश्वास...इतका वेळ तिच्याकडे पाहणं बरं नाही..मला माझ्याच नजरेची भीती वाटली..मी इतर माणसाकडे बघायला लागलो..ही माणसं कशी असतील? ...मोजणं अशक्यच. पण प्रत्येकजण वेगळा होता......तीच गोष्ट बायकांची..मी प्रत्येकीकडे पाहत होतो.,,,.(तसं नेहमीच पाहतो..) आणि पुन्हा तिच्याकडे पाहत होतो......ब-याचजणी सुंदर होत्या,,,..पण ही वेगळीच होती..किती त-हेचं सौंदर्य असू शकतं?
..ति आकाशात काहितरी पाहत होती..मीही पाहीलं..हिला निर्माण केल्यावर आता  त्या आकाशातल्याजवळ काहितरी उरलं असेल का?
              मामांनी आवाज दिल्यावर मी भानावर आलो..पण तो चेहरा विसरणं शक्य नव्हतं...आजुबाजुला बरेच लोक..काही आपले..काही परके..माझे विचार कुणालाच समजले नव्हते...माणुस किती एकटा असतो हे मला नव्याने जाणवलं...
              मान वळवली तर ती खिडकीतुन गायब...ती हरवली..मी कधीच हरवलो होतो...तिला तिचे व्याप असतील..त्यात मी कुठेही नसेन..मलाही खूप व्याप होते...पण तिला पाहिल्यावर सगळाच विसर पडला...
                मामा म्ह्णाले,'' चल लवकर, ते लोक वाट पाहत असतील..." माझ्या मनाची घालमेल फक्त मीच समजु शकत होतो...कुठेही जाण्याची माझी इच्छा नव्हती...पण आम्ही त्यांच्या घरी गेलो..
                माझं नशीब प्रथमच इतकं जोरावर होतं..कि,...ति खिडकी पण त्यांची आणि ती खिडकीत उभी असणारी मुलगी पण त्यांचीच..ग्रेट मॅन..माझे होणारे सासरे...मी लगेच त्यांना सांगणार होतो, ''मुलगी पसंत आहे मला...जवळचा मुहुर्त बघुन वाजवुन टाकुया.."
पण तिला मी आवडलो की नाही ते कसं कळणार्..म्ह्णतात, मुलगी हसली की फसली...मी तिच्या हसण्याची वाट पहायला लागलो..ती मामांकडे पाहुन हसली..आणि मी सगळं विसरलो...
            मी तिला पहायला आलो आहे, हे तिला माहीत नसावं बहुतेक..तीने साधासा ड्रेस घातला होता..ना मेकअप...ना दागिने..नैसर्गिक सौंदर्याचा अविष्कार होती ती!..माझ्याकडे पाहतही नव्हती ती.. .माझ्या चेह-यावरच्या पिपंल्सना कुठे लपवू असं वाटायला लागलं..ही मला नक्कीच नापसंत करणार...मामा मला हळूच म्हणाले, '' काही विचारायचं तर विचार..''
             मी तिला काय विचारणार होतो..मी वेडा झालो होतो..तिच्यासाठी..तरीही एक प्रश्न विचारला, ''तुमची उंची किती आहे?" तिने चमकून माझ्याकडे पाहिलं..मला काय म्हणायचं आहे हे तिने ओळखलं असावं बहुदा...क्षणभरच माझा वरचा श्वास वरच राहिला.. ही बया अपमान करील का? सौंदर्याचा काय भरवसा? पण ती अगदी मोकळं मोकळं हसली...
आणि मी पुन्हा एकदा सगळं विसरलो...ती हळूच म्ह्णाली, '' एकशे त्रेपन्न सेंटीमिटर''...आणि पुन्हा एकदा गोड हसली..हीला कसं माहित पडलं कि, गणिताचा आणि माझा छत्तीसचा आकडा आहे...मी बराच वेळ इंच, सेंटीमिटर आणि फूट यांचा हिशोब मनातल्या मनात करत होतो...
ब-याच गप्पा झाल्यानंतर तिच्या आईने केलेले कांदा पोहे खाऊन आम्ही निघालो...जड अंत:करणाने तिचा निरोप घेतला...
       कुठ्ल्यातरी पुस्तकात वाचलं होतं..''पोरगी म्हणजे झुळुक..अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही."
हि झुळूकच होती का ?
होय ! पण ती गेली नव्हती..ती माझ्याभोवती फेर धरून होती. स्पर्शाचा गोफ विणत होती...अमाप सुख देत होती..तितक्याच वेदनाही देत होती..मोरपिसाने कधी ओरखडा उठतो का?
पण तसं घडत होतं..मी तिला कधीच धरुन ठेवू शकणार नव्हतो...वाटलं ति आपल्याला कधीच मिळणार नाही..तिच्यापर्यंत आपले हात कधीच पोहोचणार नाहीत..
घरी आलो...मन उदास, बेचैन, सैरभैर...
बेचैनी कशाची हे समजलं होतं...त्यामुळे बेचैनीमागचं कारण शोधायचा जास्तीचा मनःस्ताप वाचला होता..ती झुळुक मला छळत होती.काय मजा आहे!
आजवर कमी मुली पाहिल्या का? पण सगळ्या तेवढ्यापुरत्या..पाटी पुन्हा कोरी व्हायला वेळ लागत नसे..
आजच ही ओढ का?
जीवघेणी तडफड का?
तहानभूक हरपून जावी, असं का?
ती माझ्यासाठी नाही हे कुठंतरी पटलेलं असताना हा चटका का? ह्या तहानेला काही अर्थ आहे का?
                                                                                                                                क्रमशः

कुणीतरी माझे..

                 कुणीतरी माझे, आज माझे राहले नाही....गेले ते दिवस...त्या दिवसांच्या आठवणी फक्त मागे उरल्या आहेत..एकेकाळी चंद्र आणि आम्ही दोघं सोबत फिरत असू, वेळेचं भान विसरून...आज ओळख न देता तो निघून जातो...आणि 'चांदी की दीवार ना तोडी, प्यारभरा दिल तोड दिया' हा अफसोस मात्र सलत राहतो.

''क्या जमाना था कि हम रोज मिला करते थे..
रातभर चांद के हमराह फिरा करते थे..
देखकर अब हमें चुपचाप गुजर जाता है..
कभी उस शख्स को हम प्यार किया करते थे...''

               आजही चंद्र आणि ता-यांच्या सोबतीनं जागणं आणि फिरणं सुरुच आहे..पण एकटीनं..

''हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी..
तूच नाहीस इथे हात धरायासाठी...''

                रात्र सरते..चंद्रासोबत प्राणही मावळायला लागतो...जगण्याचा जीवघेणा प्रयास मात्र सुरुच राहतो..हा प्रयत्नही शांतपणे करु देत नाहीत ते अवती-भवतीचे लोक..हजार चौकश्या करुन अधिकच हैराण करुन सोडतात....कळत नाही, काय उत्तर द्यावं त्यांना?

''जो पुछ्ता है कोई, सुर्ख क्यों हैं ऑखें..
मैं ऑखे मल के कहती हूँ, रात सो न सकी..
हजार चाहूँ मगर ये न कह सकूगी कभी..
कि रात होने की ख्वाहिश थी और रो न सकी...''

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

माझं..आणि फक्त माझं...?

सगळेच स्वार्थी या जगात......तरीही एक इच्छा आहे मनात...
असावे कोणीतरी माझी वाट पाहणारं...
माझ्यावर रागावुन स्वतःच क्षमा मागणारं...
माझ्यात स्वतःला हरवुन जाणारं...
खरंच कोणीतरी असावं...
मनातल्या मनात....
ख-या प्रेमाचं नातं हळूवार जपणारं.....
असेल का कुणीतरी....?
माझं..आणि फक्त माझं...?
सगळेच स्वार्थी या जगात...तरीही एक इच्छा आहे मनात...

बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

तू कसा आहेस...सांगू...?

इजिप्तच्या पिरॅमिडप्रमाणे की अंजिठ्याच्या भित्तीचित्राप्रमाणे,

वाळवंटातील मृगजळ की लखनौच्या इमामवाडयातील भूलभुलैया...?

गूढ नेमकं उकलत नाही....

तरीही आहेस तू एक कोडं, लोभवणारं,

मोहवणारं, न सुटणारं, धूसर नाही, तरीही गूढ....?

मला आवडणारं....एक कोडं.....

कविता.....

माझं उमलणं, तुझं बघणं....

तुझ्या डोळ्यांत माझं हरवणं...

हेच विश्व माझं म्हणत...

अवतीभवती तुला धुंडाळ्णं....


                                             माझं असं होतं काय...?

                                             माझ्यापाशी राहिलं काय...?

                                             कसं सांगु तुला आता...

                                             तू नसताना होतंय काय...?

पाऊस.....

२०.१०.२०१०

काल त्याने पावसाला खूप शिव्या घातल्या...कदाचित त्यानेही कधी ऐकल्या नसतील अश्या...पावसाने त्याचा सगळा दिवस खराब केला होता म्हणे....

त्याला आणि मला पाऊस खूप आवडायचा....आयुष्यातले खूपसे क्षण या पावसानेच अविस्मरणीय केलेत....पावसात भिजलेला 'तो' आजही प्रत्येक पावसात मला आठवतो....

पाऊस कधीच अवेळी पडत नाही रे...आपल्याच वेळा चुकलेल्या असतात...कदाचित त्यामुळेच कधीकाळी आवडणारा पाऊस नकोसा वाटायला लागतो...दिवसेंदिवस आपण फारच प्रक्टिकल व्हायला लागलो का रे....?

असो...उत्तराची वाट पाहत आहे....

तुझीच......

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

आजची स्त्री....

संस्कृतीचा अभिमान असणारी....

नवे बदल मुक्तपणे स्वीकारणारी....

कुटुंबाविषयी जिव्हाळा असणारी...

करियर विषयी जागरुक असणारी....
उद्याची स्वप्नं पाहणारी....

पण वर्तमानात जगणारी...

कर्तव्य आणि जबाबदा-यांच्या पलीकडे..

स्वतःच्या अस्तित्वाचं भान राखणारी...

वेगळी; तरीही चारचौघीसांरखी.....