शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

कथा डायरीची (२)

पार्श्वभुमी...

                    या कथेमागचा खरा आनंद अनुभवण्यासाठी या कथेतल्या दोन्ही पात्रांची पार्श्वभुमी जाणुन घेणे गरजेचे आहे..म्हणुन हा पार्श्वभुमी लिहण्याचा अट्टाहास...पार्श्वभुमी लिहितेय म्हटल्यावर कथेतली पात्रं म्हणाली, "आम्हीच सांगतो की, आमची पार्श्वभुमी.." लगेच बायको उताविळपणे म्हणाली, "मी आधी सांगणार..पहिल्या रात्री तुला सांगितलं तसं...". नवरा शांतपणे म्हणाला,''बरं, तसं पण लेडीज फर्स्ट...". तीने लगेच सुरवात केली...

                 "मी आत्ताची सौ. रुचिरा गौरव जोशी, आणि आधीची कुमारी रुचिरा वैभव देशमुख...माझं नाव बदललं नाही गौरवनं...त्याला माझं नाव खुप आवडतं..तर मी मुंबईत जन्मले, वाढले. वाळकेश्वर सारख्या निसर्गरम्य परीसरात राहत होतो आम्ही..त्यामुळे लहानपणीचे संवगडी तसे उच्चभ्रु घरातलेच..आमचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय आणि त्रिकोणी..म्हणजे मी, आई आणि पप्पा...एकटीच मुलगी असल्यामुळे पप्पांनी खूप लाड केले..हवं ते मिळत गेलं लहानपणापासुन..त्यामुळे स्वभाव थोडाफार हट्टीच...पप्पा तर मला आपला मुलगाच समजायचे..त्यामुळे मी बोल्ड होते ब-यापैकी पण तितकीच बालीशही...घरातल्या कामांचा प्रचंड कंटाळा..वास्तविक आई-पप्पानी कधी सवयच लावली नाही कामाची...मित्र-मैत्रिणी पुष्कळ..खरं तर मित्रच पुष्कळ..मित्र खूप भेटले, पण सखा कुणी भेटला नाही..ज्याची सोबत आयुष्यभर असावी असं वाटेल, ज्याच्यावर जिवापाड प्रेम करावं असं वाटेल..वय वाढेल तसा समंजसपणा वाढत गेला..कॉलेजमध्ये गेल्यावर जगच वेगळं वाटायला लागलं..आणि इथेच माझा प्रेमाचा शोध संपला..पहिल्यांदा प्रेमात पडले..फक्त एवढंच सांगते कि गौरवची ओळख व्हायच्या आधी मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते..म्हणतात पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही..पण तो सोडून गेला, मला एकटीला..आयुष्याच्या अश्या वळणावर..जिथुन एकटीला पुढे जाण्याची भीती वाटायला लागली..तिथेच रेगांळले खूप वेळ..त्याच वळणावर त्याला खूपदा शोधलं पुन्हा पुन्हा.. पुढे काय झालं ते माझी डायरी वाचुन तुम्हांला समजलेच..."
                असं म्हणुन ती आमच्या दोघांच्या तोंडाकडे पाहायला लागली..म्हणाली, ''सगळंच सांगितलं तर माझी डायरी कोण वाचेल..?''
                गौरव तिच्याकडे कौतुकाने पाहायला लागला..खरंच प्रेमात पडणा-या माणसाला सगळयाच गोष्टीचं कौतुक वाटतं..उदया ती साधं शिकंली जरी असती तरी त्याला तिचं कौतुक वाटलं असतं..असो..

                   मी गौरवला म्हटलं, ''आता तु सुरवात कर..''


                  '' मी गौरव पांडुरंग जोशी..आमचंही कुटुंब तसं छोटंसंच..मी, आई, बाबा, आणि माझी मोठी बहीण सुमित्रा..बेळगावमधल्या छोट्याश्या गावात माझा जन्म झाला...दहावी पर्यंतचं शिक्षण तिथलंच.रम्य या शब्दाला पुरुन उरेल असं माझं बालपण..मस्त विहिरीत पोहायचो..मी पोहायलो शिकलो तो मोठा किस्साच आहे..वाचायला मिळेल तुम्हांला, डायरीतल्या कुठल्यातरी पानावर..माझं गाव आणि माझं बालपण...पण, त्यामुळे मुंबईत आल्यावर बावचळलो..डिप्लोमा आणि डिगरी मामांच्या घरी राहुन पूर्ण केलं..खूप मित्र झाले..मुलींना फक्त पाहयाचो पण त्याच्यांबरोबर बोलण्याचं धाडस करू शकलो नाही..मैत्री तर खुप दूरची गोष्ट होती माझ्यासाठी...रूचाला पाहिलं आणि सगळं विसरलो..फक्त ती आणि फक्त तीच..'' मी गौरवला मधेच थांबवत म्हटलं,''अरे तुझ्याबद्दल सांग रे.." गौरव आपल्या गोंधळ्या नावाला सार्थकी लावत थोडासा गोंधळला...थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, ''हो हो..मी काय सांगू माझ्याबद्दल? मी रूचा सारखं आणखी कुणाच्या प्रेमात पडलो नाही.. तेवढा वेळच मिळाला नाही..सुमीचं लग्न झालं आणि मी एकटा पडलो..खूप पैसा कमावायाचा आणि मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं...मग लग्न करायचं असं सगळ्यांचं असतं तसं साधंसं स्वप्न होतं माझं..रूचा माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्याची ध्येयं, धोरणं बदलून गेली..आता मी फक्त तीला सुखात ठेवण्यासाठी जगतोय...'' मी मनात म्हटलं, याची गाडी पुन्हा एकदा रूचा नावाच्या ट्रॅकवर यायच्या आधी थांबावायला हवी..मी त्याला म्हटलं, '' पुरे आता गौरव, आपण पुन्हा एकदा आपल्या डायरीकडे वळूया..." तो म्हणाला, '' ठिक आहे.."


नवरा:

१३.०३.२००४

                 आज दिवसभर कशातच लक्ष लागत नव्हतं..वाटलं मामांनी तरी फोन करून विचारायला हवं होतं..मामांचा भलताच हट्ट म्हणे कि आपली मुलाकडची बाजू..त्यांना फोन करू दे..माझा इथे जिव जातोय..कुणाला माझी काळजी नाही..सारखी ती माझ्या डोळ्यासमोर येत होती..तीचं ते गोड हसणं..तीला कदाचित हे माहितही नसेल कि तिच्या रेखीव पातळ ओठांवरचा तीळ मला किती बेभान करत होता..तीचे डोळे मला सतत शोधत होते..का मीच तीला शोधत होतो..वेडा झालो आहे मी तिच्यासाठी, तिच्या एका भेटीसाठी...एक फोटो तरी घ्यायला हवा होता तिचा..ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल..म्हणत असेल काय बावळट मुलगा आहे हा.. नुसता पाहतोय माझ्याकडे..पण तिला जाणिव असावी स्वतःच्या सौंदर्याची...म्हणतात सुंदर मुलींना खूप गर्व असतो स्वतःच्या सौंदर्याचा..पण ही तशी नसावी..आणि असला जरी गर्व तरी त्यात काय गैर आहे...ती आहेच तेव्हढी सुंदर..मामा म्हणत होते, बघ विचार कर मुलीची उंची थोडी कमी वाटते...जाणवलं मला ते..पण तिचा चेहरा पाहिला आणि आणखी काही मला दिसलंच नाही...मगाशी गच्चीत उभा होतो तेव्हा चांदण्यांतून चालत चालत ती माझ्याकडे आली..मी स्तब्ध उभा होतो..हाताची घडी घालून..जणू तीचीच वाट पाहत होतो..ती आली आणि कठडयाला टेकून माझ्या शेजारी उभी राहली..त्या चांदण्यासारखीच मौन.. ह्या गडद पिठूळ चांदण्यानं जादू केली होती... हाताला लागेल का गं हे चांदणं? मी वेडयासारखा हात फिरवून पाहिला..चांदण्याचा स्पर्श होत नाही...ते फक्त जाणवतं..खरं सांगु तर तूही मला जाणवतेस सारखी पण तूझा स्पर्श माझ्या नशिबात आहे कि नाही माहीत नाही...तिला उदया फोन करायचं ठरवलं आहे मनात..
                                                                                
                                                                                                                                                     क्रमशः